कामगार मृत्यू प्रकरणी ‘ओमॅट’ कंपनीविरोधात ३ फौजदारी खटले
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश
चंद्रपूर : ताडाळी येथील औद्योगिक वसाहतीतील ओमॅट वेस्ट लिमिटेड कंपनीत कामगारांच्या मृत्यूची घटना घडली असून, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची व कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. दोन्ही अपघातांबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून चौकशीदरम्यान आढळून आलेल्या भंगाबाबत मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय चंद्रपूर यांच्या न्यायालयात कारखान्याचे भोगवटादार यांचे विरूध्द एकूण ३ फौजदारी खटले दाखल करण्यात आल्याचे कामगार मंत्र्यांनी सांगितले.
दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता अजय रवींद्र राम (रा. बिहार) या कामगाराचा २० फुट उंचीवरून २०० किलो स्टील स्क्रॅप अंगावर पडून मृत्यू झाला. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने कोणताही मोबदला न देता परस्पर मृतदेह बिहारला पाठवला. यापूर्वी, दिनांक २३ जून २०२४ रोजी श्यामसुंदर ठेंगणे या कामगाराचाही अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना उर्वरित १५ लाखांची नुकसानभरपाई अद्याप देण्यात आलेली नाही. कंपनीत याआधीही अनेक कामगारांचा सुरक्षाव्यवस्थेअभावी मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही प्रकरण आमदार सुधाकर अडबाले यांनी उचलून धरले होते.
या कंपनीत कामगारांसाठी आवश्यक सुरक्षात्मक साधनसामग्री पुरवली जात नाही, तसेच सुरक्षा अधिकारीही नेमलेला नाही, असेही आरोप करण्यात आले. याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली.
आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्नावर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी उत्तर देताना सांगितले की, अजय रवींद्र राम हे राज्य कामगार विमा योजनेंतर्गत नोंदणीकृत असल्याने त्यांच्या कुटुंबाला २ लाख सानुग्रह अनुदान व इतर लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
श्यामसुंदर ठेंगणे यांच्या कुटुंबास ३० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या पत्नीला २०१.८६ रुपये प्रति दिवस, मुलगा व मुलीला प्रत्येकी १३४.५७ रुपये प्रति दिवस लाभ राज्य कामगार कार्यालयाकडून मंजूर झालेला आहे. यापूर्वी १६ जून २०२२ रोजी निकलेश हरीराम इनवटे या कामगाराचा मृत्यू झाला होता, तर १६ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या अपघातात सिकंदर यादव गंभीर जखमी झाले होते. या कामगाराचा उपचारादरम्यान ३ फेब्रुवारी २०२५ रोजी मृत्यू झाला.
कामगारांच्या अपघातांसंदर्भात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने चौकशी केली असून, मुख्य न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर न्यायालयात कारखान्याच्या भोगवटादारांविरोधात ३ फौजदारी खटले दाखल करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी उत्तरात दिली.